Wednesday, August 20, 2008

मेंदू करा रे प्रसन्न!

मेंदू करा रे प्रसन्न!

- डॉ. आनंद जोशी

मेंदू विज्ञानातील नव्या संशोधनांमुळे माणसाच्या वर्तनावर, त्याला येणाऱ्या अनुभवांवर प्रकाश पडत आहे. अतींद्रिय अनुभव आणि त्यातील गूढता या संशोधनाने भेदली जात आहे.

गूढ अनुभव ही मेंदूचीच करामत असते, मन आणि मेंदू हे एकच असते, नवं शिकण्यासाठी तरुणच असायला हवे असे नाही, मेंदू कोणत्याही वयात नव्या गोष्टी आत्मसात करू शकतो, मानवी मेंदू हा अतिशय लवचिक असतो... अशा अनेक थक्क करणाऱ्या गोष्टी मेंदूवरील संशोधनानी सिद्ध होत आहेत. त्यामुळे मेंदू कायम प्रसन्न ठेवायला हवा. मेंदू प्रसन्न करण्यासाठी मग कोणी बौद्धिक कसरतींचा मार्ग अनुसरेल तर कोणी मेडिटेशनचा. मेंदूचे आरोग्य चांगले राहिले तर अल्झायमर, औदासीन्य यांसारखे मेंदूचे विकार दूर ठेवता येतात किंवा त्याची तीव्रता कमी करता येते, बौद्धिक आनंद मिळवता येतो. त्यामुळेच आनंदी राहण्यासाठी मेंदूला अधिकाधिक चालना द्यायला हवी. "मेंदू करा रे प्रसन्न!' असंच हे मेंदूवरचं नवं संशोधन सांगतं.


एकविसावे शतक हे मेंदू विज्ञानाचे शतक आहे. मेंदूविज्ञानातील संशोधनामुळे माणसाच्या वर्तनावर, त्याला येणाऱ्या अनुभवावर प्रकाश पडत आहे. मेंदूत होणाऱ्या क्रिया-प्रक्रिया म्हणजे मन, असे मेंदूविज्ञान मानते. मन आणि मेंदू हे वेगवेगळे नाहीत, असे बर्ट्रांड रसेल हा तत्त्वज्ञ म्हणाला होता. ते आता सं शोधनाने सिद्ध होत आहे. माणसाला येणाऱ्या काही अनुभवांभोवती गूढ वलय असते. या गूढतेमुळे असे अनुभव दैवी किंवा "सुपर नॅचरल' असा सर्वसामान्य समज असतो. यातूनच याला अमुक सिद्धी, त्याला तमुक सिद्धी मिळाली आहे, अशा वावड्या उठतात. मेंदूविज्ञानातील संशोधनामुळे ही गूढता भेदली जात आहे.

विलक्षण अनुभव

त्रेसष्ट वर्षांच्या एका अमेरिकी गृहस्थाला एका कानात सतत घणघणाट ऐकू यायचा. सर्व तऱ्हेचे उपचार क रूनसुद्धा ही घणघण थांबली नाही, तेव्हा या रुग्‌ णाने मेंदूतज्ज्ञांचा सल्ला घेतला. ही घणघण थांबवण्याचा एक मार्ग उरला होता. मेंदूच्या उजव्या अर्धगोलातील सुपीरियर टेम्पोरप गत्यरस या भागात इलेक्‍ट्रोड्‌स ठेवून तो भाग उद्दीपित करावयाचा. अशा उद्दीपनामुळे ही घणघण थांबेल, असा तज्ज्ञांचा कयास होता. रु ग्णाने संमती दिली. मेंदूच्या उजव्या अर्धगोलात विशिष्ट जागी "इलेक्‍ट्रोड्‌स' इम्प्लांट करण्यात आले. विजेचा सूक्ष्म प्रवाह सोडून मेंदूतील तो भाग उद्दीपित करण्यात आला, त्याबरोबर रुग्णाला एक विलक्षण अनुभव आला. रुग्णाला वाटले, आपण शरीराबाहेर आहोत, आपले शरीर ऑ परेशन टेबलावर पडले आहे. उद्दीपन केल्याबरोबर हा अनुभव सतरा सेकंद टिकला. याला "आऊट ऑफ बॉडी' अनुभव म्हणतात. मेंदूतज्ज्ञसुद्धा चकित झाले. रुग्णाच्या संमतीने त्यांनी यावर आणखी संशोधन केले. असा अनुभव येताना मेंदूतील कोणती स्थळे कार्यान्वित होतात, हे मेंदूतज्ज्ञांना शोधून काढायचे होते. उजव्या मेंदूचे उद्दीपन चालू असताना ज्या वेळी रुग्णाला असा अनुभव येईल, त्याच क्षणी त्याच्या मेंदूचे "पीईटी' स्कॅनिंग केले. असे बारा स्कॅन्स केले. "पीईटी' स्कॅनिंगमध्ये रिअल टाइम म्हणजे त्याच क्षणी मेंदूत काय घडामोडी होतात, हे दिसते. रुग्णाला आऊट ऑफ बॉडी अनुभव येत असताना मेंदूतील कोणती स्थळे उजळून निघतात, हे दिसून आले. त्याचा नकाशा तज्ज्ञा ंनी तयार केला. त्याची सुलभ माहिती पुढीलप्रमाणे -

आपल्या शरीराची अवकाशातील स्थिती (स्पेशिअल ओरिएंटेशन) कळण्यासाठी डोळ्याकडून त्वचेतील स्‌ पर्शेंद्रियांकडून, तसेच कानाच्या आतल्या भागात असलेल्या शरीराचा तोल सांभाळणाऱ्या केंद्राकडून जे संदेश येतात त्याचे एकात्मीकरण व्हावे लागते. हे एकात्मीकरण उजव्या अर्धगोलातील टेम्पोरल लोब व परायटल लोब यांच्या जंक्‍शनजवळ होते. आऊट ऑफ बॉडी अनुभव येताना उजव्या मेंदूतील नेमकी हीच जागा उजळून निघालेली स्कॅन मध्ये दिसली. या विविध संवेदनांचे एकात्मीकरण (मल्टिसेन्सरी इंटिग्रेशन) यो ग्य प्रकारे होत नसल्यामुळे रुग्णाला आऊट ऑफ बॉडी अनुभव येत होता, असा या संशोधनाचा निष्कर्ष होता. हा शोधनिबंध १ नोव्हेंबर २००७ च्या न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन या जगन्मान्य विज्ञानपत्रि केत प्रकाशित झाला आहे.

तज्ज्ञांचे स्पष्टीकरण - गूढता नाही, विकृती

आऊट ऑफ बॉडी हा अनुभव घेत असताना विविध संवेदनांचे एकात्मीकरण योग्य तऱ्हेने होत नाही, हे सिद्ध करण्यासाठी निरोगी उमेदवारांवर प्रयोग करण्यात आले. या प्रयोगात उजव्या मेंदूतील विशिष्ट भागांना उद्दीपन देऊन सं वेदनांच्या एकात्मीकरणात खंड पाडण्यात आला. खंड पडल्याबरोबर या उ मेदवारांना आऊट ऑफ बॉडी अनुभव आला. गेल्या शतकात पेनफील्ड या मेंदूतज्ज्ञाने मेंदूवर शस्त्रक्रिया करताना विशिष्ट भाग उद्दीपित केल्यानंतर रुग्णाला आपण शरीराबाहेर आहोत, असा अनुभव आल्याचे दाखवून दिले होते. अर्ध शिशी (मायग्रेन), एपिलेप्सी (आकडी - फिट्‌स येणे) या मेंदूच्या विकृतीमध्ये असे विलक्षण अनुभव येतात, याचे कारण हेच असावे, असे मेंदूतज्ज्ञांचे मत आहे. विविध प्रकारच्या स्कॅनिंगमध्ये तसा पुरावाही मिळाला आहे.

काही मनोरुग्णांना स्वतःच्या व्यक्तित्वाचा विसर पडतो (डिपर्सनालायझेशन), म्हणजे आपण "स्व'पासून वेगळे आहोत असे वाटते, तर काहींना आजूबाजूचे जग खोटे आहे असे वाटते (डिरिअलायझेशन). असे अनुभव टेम्पोरल लोबच्या विकृतीमुळे होतात, असे मेंदूतज्ज्ञांचे मत आहे.

असे अनुभव अतींद्रिय नसून मेंदूच्या कार्यात खंड पडल्यामुळे किंवा त्रुटी नि र्माण झाल्यामुळे होतात. यात गूढ काही नाही, हा महत्त्वाचा मुद्दा मेंदूतज्ज्ञांनी अधोरेखित केला आहे. ब्रिटिश न्यूरॉलॉजिस्ट मायकेल ट्रि म्बल यांनी "दि सोल इन ब्रेन' या पुस्तकात "एपिलेप्सी'बद्दलचे सखोल विवेचन केले आहे. "ए पिलेप्सी' असलेल्या व्यक्तींमध्ये धार्मिक भावना प्रबळ असतात, असे रुग्‌ णकथा व इतर संशोधनांनी त्यांनी दाखवून दिले आहे. पाश्‍चात्त्य

जगातील धर्माच्या इतिहासाचा त्यांनी अभ्यास केला. पाश्‍चात्त्य धर्मातील महान व्यक्तींना एपिलेप्सीचा विकार असावा, असे त्यांना आढळून आले. मॉरमॉ निझमचे संस्थापक जोसेफ स्मिथ यांना बेशुद्धावस्था व वाचा बंद होण्याचे झटके येत असत. हा एपिलेप्सीचा प्रकार असावा, असे त्यांचे मत आहे.

एकोणिसाव्या शतकातील प्रसिद्ध मनोवैज्ञानिक व तत्त्वज्ञ विल्यम जेम्स यांनी "दि व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्‍सपीरियन्सेस' या पुस्तकात अनाहत ध्वनी, डोळ्यांपुढे विलक्षण दृश्‍ये दिसणे, असे अनुभवही "ऑडिटरी व व्हिज्युअल' हॅल्युसिनेशन्स- म्हणजे ऐकण्याचे व दृष्टीचे सं वेदनभ्रम असतात, हे अतींद्रिय अनुभव नव्हेत, असे नमूद केले होते. आज मेंदू विज्ञानातील सं शोधनामुळे ते सिद्ध होत आहे.

रोलॅंड ग्रिफिथ्स यांच्या चमूने निरोगी उमेदवारांना काही विशिष्ट औषधे दिली. या औषधांमुळे मेंदूतील चेताप्रेषकांवर, म्हणजे मेंदूतील काही रसायनांवर प रिणाम होतो. ही औषधे घेतल्यानंतर या निरोगी उमेदवारा ंना बराच काळपर्यंत धार्मिक भावनांचा अनुभव आला. "स्व'चा अर्थ, आध्यात्मिक मर्म, असे या अनुभवाचे स्वरूप होते. ही औषधे मेंदूतील कोणत्या रसायनांवर परिणाम करतात, हे माहीत असल्यामुळे व ही रसायने मेंदूच्या कोणत्या भागामध्ये तयार होतात हेही ठाऊक असल्यामुळे धार्मिक भावनांचे मेंदूतील केंद्र शोधता येईल, असा मेंदूतज्ज्ञांचा कयास आहे.

मेंदू आणि सर्जनशीलता

मेंदूचा उजवा भाग हा भावनिक, तर डावा भाग विश्‍लेषणात तरबेज, उजवा कलात्मक तर डावा भाग तर्क बुद्धीशी निगडित, असे मानले जाते. हे ढोबळ मानाने खरे असले तरी मेंदूचे दोन्ही भाग एकमेकांच्या साह्याने काम करतात, हे आता सिद्ध झाले आहे. कलेच्या निर्मितीसाठी भावनात्मक उजव्या मेंदूला डाव्याची म दत होते त्याचप्रमाणे विज्ञानातील शोध नुसत्या तर्कबुद्धीने लागत नाहीत. त्याला ऊर्मीची, म्हणजे उजव्या मेंदूची गरज लागते. मेंदू "होलिस्टिक' पद्धतीने काम करतो; पण उजव्या व डाव्या मेंदूच्या कार्याची सरमि सळ कशी होते, हे सुविकसित होणाऱ्या स्कॅनिंग तंत्रज्ञानामुळे व बोधन चाचण्यांमुळे (कॉ ग्निटिव टेस्टिंग) शक्‍य होणार आहे. निर्मिती करताना कवीला, कलावंताला किंवा वैज्ञानिकाला विलक्षण वैयक्तिक अनुभव येतात, पण या अनुभवात अतीं द्रिय काही नसते. ते अनुभव मेंदूमुळेच निर्माण होतात, असे मेंदूतज्ज्ञांनी दाखवून दिले आहे.

"फ्रॉंटियर्स ऑफ न्यूरॉलॉजी अँड न्यूरोसायन्स' या दर्जेदार ग्रंथात जगातील प्र सिद्ध कलावंत, लेखक- कवी, तत्त्वज्ञ यांना कोणत्या मेंदूच्या विकृती होत्या, याचे तपशीलवार विवेचन केले आहे. दोस्तोव्हस्की या अ भिजात लेखकाला एपिलेप्सीचा विकार होता. फीट येण्याआधी त्याला एक निराळाच अनुभव येई. त्यात त्‌ याला प्रचंड आनंद होत असे. ""कोणत्याही मोबदल्यात मी हा आनंद सोडणार नाही,'' असे तो म्हणत असे. फीट येण्याआधी असा अनुभव येतो त्याला "ऑरा' म्हणतात. हे "ऑरा' विविध प्रकारचे असतात. मेंदूतील विद्युतमं डलात गडबड झाल्यामुळे असा अनुभव येतो. हा अतींद्रिय अनुभव नसून, मेंदूच्या विकृतीचा एक भाग असतो. कला मेंदूत उगम पावते तसेच काही विकृती मेंदूत उगम पावता. या दोहोंचा काही संबंध आहे का, याचा शोध घेण्याचे मार्ग स्कॅनिंगच्या नवनवीन तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होत आहेत.

प्रसिद्ध चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉ हा मनोरुग्ण होता. त्याला कधी उन्माद, तर कधी औदासीन्याचे झटके येत. त्यांनी काढलेली चित्रे व त्याची मेंदूची विकृती यांचा काही तरी संबंध असावा, असा मेंदूतज्ज्ञांचा कयास आहे.

नित्शे या तत्त्वज्ञाला सिफिलीसमुळे मेंदूची विकृती झाली होती. त्याचे प्रखर विचार यातून निर्माण झाले असतील. ""नित्शेला झालेली मेंदूची विकृती त्याने विज्ञानाच्या कामी लावली,'' असे फ्रॉइड नित्शेबद्दल म्हणला होता, त्याच्यात काहीतरी तथ्य असावे, असे मेंदूतज्ज्ञांना वाटते.

डॉ. रामचंद्रन यांनी नादिया या ऑटिस्टिक मुलीचे उदाहरण कला आणि मेंदू या ंच्या संदर्भात दिले आहे. तिचा बुद्‌ध्यांक साठ होता; पण ती सहा वर्षांची असताना उत्तम चित्रे काढत असे. तिने काढलेली घोड्य ाची चित्रे इतकी अप्र तिम होती, की घोडा कॅनव्हासवरून खाली उडी मारेल, असे बघणाऱ्याला वाटावे. डॉ. रामचंद्रन यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे. असा `ऑ टिस्टिक सावंट' माणूस खरा जिनियस होत नाही. कारण खरा जिनियस होण्यासाठी इतर कितीतरी गुणविशेष लागतात. तेव्हा खरा जि नियस आणि सावंट यांच्यात समाजाने गल्लत करू नये. हा कळीचा मुद्दा आहे.

दर वेळेला विकृती आणि निर्मिती यांचा सकारात्मक संबंध असतो असे नाही. कार्लस हॉर्न हा प्रसिद्ध जर्मन चित्रकार, पण याला अल्झायमर झाल्यानंतर त्याच्या चित्रकलेला ओहोटी लागली. तो पूर्वीसारखी उत्तम चित्रे अल्झायमर झाल्यानंतर पुन्हा कधीही काढू शकला नाही.

मेंदूची लवचिकता

""आकृती संगमरवरामध्ये तयार होण्याआधीच ती शिल्पकाराच्या डोक्‍यात तयार झालेली असते,'' असे म ायकेल अँजेलो म्हणाला होता. या वाक्‍याचा मेंदू विज्ञानाला अभिप्रेत असलेला अर्थ महत्त्वाचा आहे. मेंदूतील विविध जोडण्यां मुळे कलेची निर्मिती होत असते. प्रत्येकालाच या क्षमता असतात असे नाही, पण ज्याच्यात आहेत त्यांना योग्य वातावरण- म्हणजे नर्चर संगोपन- मिळाले तर या पेशींच्या जोडण्यांचा बाह्या विष्कार होतो. पण पेशींच्या जोडण्या बळकट करण्यासाठी प्रयत्न लागतातच. गायकाला रियाज करावा लागतो, चित्रकाराला चित्रे काढावी लागतात, लेखकाला लिहीत राहावे लागते. प्रयत्न केले नाहीत तर मि ळालेल्या क्षमता गमवाव्या लागतात. "यूज इट ऑर लूज इट' असा हा प्रकार. कारण मेंदू लवचिक असतो.

काही सर्जनशील माणसे विक्षिप्त असतात, असेही आपण पाहतो. हा वि क्षिप्तपणासुद्धा मेंदूतील जोडण्यांमुळे त्यांना मिळालेला असतो. काहीही असले तरी त्याच्यात अतींद्रिय काही नसते, हा मुद्दा महत्त्वाचा.

मेंदू "प्लॅस्टिक' असतो, चिकणमातीला हवा तो आकार देता येतो, पुन्हा बदलता येतो, या गुणधर्माला "प्लास्टिसिटी' म्हणतात. मराठीत लवचिकपणा. मेंदूचा आकार तीच क्रिया पुनःपुन्हा करून बदलता येतो. हे प्रौढ मेंदूतही घडते. याचा अर्थ मेंदूचा ढोबळ आकार बदलत नाही, तर सूक्ष्म स्तरावर मेंदूतील पेशीच्या जोडण्यांची संख्या वाढते. सूक्ष्म स्तरावर मेंदूचा आकार बदलतो. मेंदूच्या कार्यात बदल होतो. त्यायोगे म ाणसाच्या वर्तनात बदल होतो. माणसांच्या वर्तनात बदल होतो. माणसांच्या क्षमतांमध्येही थोडाफार बदल होऊ शकतो.

मेंदूमध्ये शरीराच्या अवयवाचे प्रतिनिधित्व करणारे नकाशे असतात. एखादा बोटाने वाद्य वाजवणारा कलाव ंत असतो, तो रियाज करतो. त्याच्या मेंदूतील अवयवांच्या नकाशात त्याच्या बोटांनी जास्त जागा व्‌ यापलेली असते. फुटबॉ लपटूच्या मेंदूच्या नकाशात पावलाने जास्त जागा व्यापलेली असते. लंडनमधील ट ॅक्‍सी ड्रायव्हरच्या मेंदूचे स्कॅनिंग करून पाहिले तेव्हा रस्त्यांची स्मृती साठवण्याची मेंदूतील जागा ही सामा न्य माणसाच्या मेंदूतील अशा जागेपेक्षा मोठी होती, असे आढळले. यालाच मेंदूची प्लास्टिसिटी म्हणतात. या प्लास्टि सिटीचे आणखीही आविष्कार आहेत. ते कसे ते पुढे पहा -

मेडिटेशन आणि मेंदू

हार्वर्ड विद्यापीठ व मॅसॅचुसेट्‌स जनरल हॉस्पिटलमधील मेंदूतज्ज्ञ सारा लाझार यांच्या संशोधक चमूने मे डिटेशन- ध्यान करण्यावर प्रयोग केले. रोज चाळीस मिनिटे मेडिटेशन, याप्रमाणे सातत्याने नऊ वर्षे मे डिटेशन करणाऱ्या उमेदवारां च्या मेंदूचे प्रयोगाच्या सुरवातीला व अंताला म्हणजे नऊ वर्षांनंतर परत, असे दोन्ही वेळा स्कॅनिंग केले, तेव्हा त्या उमेदवारांच्या मेंदूच्या कॉर्टेक्‍सची जाडी थोडी वाढल्याचे दिसून आले. हे संशोधकांना अपेक्षित होते. कोणतीही क्रिया पुनःपुन्हा केल्यावर त्याचा प्रौढांच्या मेंदूवरही परिणाम होतो. कारण प्रौढांचाही मेंदू लवचिक (प्लॅस्टिक) असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मेडिटेशनचे प रिणाम अतींद्रिय असतात असा समज होता. त्याला धक्का देणारे हे निष्कर्ष होते. भावनांचे संतुलन, एकाग्रता या च्यासाठी मेडिटेशन ध्यान, सेक्‍युलर कॉंटेम्प्लेशन, धर्मनिरपेक्ष चिंतन-मनन याचा उपयोग होतो. मेंदूतील कोणत्या केंद्रावर मेडिटेशनचा परिणाम होऊन भावनांचे संतुलन, एकाग्रता या क्षमता नि र्माण होतात, याबाबतचे संशोधन चालू आहे. हे परिणाम अतींद्रिय नसून, ऐंद्रिय अवयवाशी संबंधित आहेत, हे सिद्ध हो ण्यास मदत होणार आहे.

स्वतःच्या मनाचा धांडोळा घेणे हा मेडिटेशनचा उद्देश असतो. मन म्हणजे मेंदू. मेडिटेशन हा मेंदूचा शोध घेण्याचा एक मार्ग ठरू शकतो. त्यासाठी मेंदू विज्ञानाला मेडिटेशनच्या संशोधनात रस आहे. मेडिटेशनमध्ये स्वेच्छेने एकाच ठिकाणी "अटेन्शन' ठेवायचे असते, हे कठीण असते. विल्यम जेम्स हा मनोवै ज्ञानिक म्‌ हणाला होता, ""ऐच्छिकतेने अटेन्शन, एकाग्रलक्ष्य ठेवणे, ही मानवी मनासाठी (ह्यूमनसायकी) एक विरळा घटना आहे.'' मेडिटेशनची परंपरा हा पा ैर्वात्य तत्त्वज्ञानाचा महत्त्वाचा पैलू आहे. यात गूढ काही नाही. तेव्हा "अटेन्शन- ट्रेनिंग'साठी प्रिन्स्टन विद्यापीठातील संशोधक जोनाथन कोहेन मेडिटेशनचा मेंदूविज्ञानाच्या दृष्टीने शोध घेत आहेत.

आज शाळा, कॉलेज, विद्यापीठ या तिन्ही स्तरांवरचे शिक्षण दिले जाते, त्यात विश्‍लेषण कौशल्य (ऍनॅलॅ टिकल स्किल्स) विकसित करण्याकडे भर असतो. फक्त फॅक्‍ट्‌सवर जोर दिलेला असतो. मूलभूत एकाग्र तेचे कौशल्य विकसित (अटेन्शन स्किल्स) करणे, संश्‍लेषणाची (सिंथेटिक) आणि निर्मितीची कौशल्ये विकसित करणे, याकडे दुर्लक्ष केले जाते. धर्मनिरपेक्ष चिंतन-मननाची कौशल्ये शिकवून शिक्षणाच्या एकाच बाजूकडे ढळलेल्या तराजूच्या काट्याचे संतुलन साधता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यासाठी मेंदू विज्ञान सिद्ध होत आहे. २००५ मध्ये सोसायटी ऑफ न्यूरो सायंटिस्ट या संस्थेची वार्षिक सभा अमे रिकेत भरली होती. जगभरचे दहा हजार न्यूरो सायंटिस्ट या सभेला उपस्थित होते. दलाई लामाने या सभेत विचार मांडले होते. सेक्‍युलर कॉंटेम्प्लशन- धर्म निरपेक्ष चिंतन, मनन, एकाग्रता व शिक्षण यासंबंधीची जी चर्चा झाली त्यात वरील निष्कर्ष निघाले होते.

प्रसन्न मेंदू

मेंदू लहानपणी लवचिक असतो. त्यात जे काय बदल व्हायचे ते तरुणपण येण्यापूर्वीच होतात, असा एक समज होता. पण मेंदूविज्ञानातील संशोधनाने हा समज खोटा ठरवला आहे. मेंदू लवचिक आहे. प्रौ ढपणीसुद्धा ही लवचिकता टिकून असते. त्याचा उपयोग प्रत्येकाने करून घेतला पाहिजे. तुकारामांच्या ओळींत थोडा बदल करून म्हणता येईल- "मेंदू करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे साधन।' पण ही सिद्धी अतींद्रिय व गूढ नाही, तर ती प्रयत्नांनी कोणालाही मिळवण्यासारखी आहे.

प्रौढपणीसुद्धा मेंदू लवचिक असतो हे माहीत असणे, ही मेंदू प्रसन्न करण्याची प हिली पायरी आहे. तरुण-त रुणी सतत नवतेच्या शोधात असतात, शिकत असतात, त्यामुळे त्यांच्या मेंदूत सतत पेशींच्या नवीन जोड ण्या होत असतात. आज पन्नाशीनंतर निवृत्त झालेल्यांची संख्या वाढली आहे. निवृत्तीनंतर त्यांना जीवन ठप्प झाल्यासारखे वाटते. उदासीनता येते. "आय ऍम ऍन ओल्ड डॉग टु लर्न न्यू ट्रिक्‍स' असे तो माणूस म्हणतो. तेव्हा या ज्येष्ठ नागरिकांसाठी मेंदू विज्ञानातील हे संशोधन आशादायी आहे.

मेंदू प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकाने आपला मार्ग शोधायचा असतो, हे जरी खरे असले तरी काही मार्गदर्शक शलाका देता येतात. रॉबर्ट एपस्टेन हे कॅलिफो र्निया विद्यापीठात व्हिजिटिंग स्कॉलर आहेत. त्यांनी क्रिएटि व्हिटीवर संशोधन केले आहे. मेंदू प्रसन्न ठेवण्यासाठी त्याचा ज्येष्ठ नागरिकांना आणि कोणालाही उपयोग करता येईल.

मनामध्ये जी नवीन कल्पना येईल ती पकडून ठेवा. सोडून देऊ नका. ती उपयोगात आणण्यासाठी पावले उचला. हा किस्सा पहा. ऑटोलोवी याला पेशींच्या जैव विज्ञानाबद्दल नोबेल मिळाले. त्याला झोपेत असताना पेशींबद्दल एक नवीन कल्पना सुचली. तो जागा झाला. त्याने ती कल्पना कागदावर खरडली आणि झोपी गेला. सकाळी उठल्यानंतर त्याने तो कागद वाचण्याचा प्रयत्न केला. काही उमगेना. कल्पना गहाळ झाली. दुसऱ्या दिवशी त्याला झोपेत त्याच कल्पनेचे स्वप्न पडले. त्याने ताबडतोब कल्पना (कॅप्चर) पकडली. तो उठला. कपडे घातले आणि तडक प्रयोगशाळेत गेला. कल्पनेच्या प्रयोगाची आखणी केली. तर थोडक्‍यात काय, कल्पना उत्तम आहे; पावले उचला.

आव्हानात्मक प्रश्‍न उभे करा. येतील आव्हाने त्यांना सामोरे जा. कठीण प्रश्‍न सोडवताना वर्तनाचे नवीन नम ुने तयार होतात. त्यामुळे मेंदूच्या विविध केंद्रांत देवाणघेवाण वाढते. माहितीच्या ज्ञानाचा पट विस्तारण्याचा प्रयत्न करा. नवीन ज्ञानातील नवीन विचार एकमेकाला जोडले जातात. मेंदूची निर्मिती क्षमता तीक्ष्ण होते. तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीत वैविध्य असणे महत्त्वाचे. नवीन ठिकाणी जा, नवीन माणसांना भेटा. यातून नवीन कल्पना निर्माण होतात.

हे सर्व कशासाठी करावयाचे, हा प्रश्‍न साहजिक आहे. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण व्यायाम करतो. व्यायामामुळे एंडॉर फिन्स ही रसायने शरीरात निर्माण होतात. त्यामुळे एक सुखद भावना शरीरभर पसरते. हृदयाची, फुफ्फुसांची ताकदही वाढते. त्याप्रमाणे मेंदू प्रसन्न ठेवण्यासाठी "जॉग युवर ब्रेन' करावे लागते. या बौद्धिक कसरतींचा दुहेरी फायदा होतो. बौद्धिक कसरतीमुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहून डिमेन्शिया, अल्‌ झायमर, औदासिन्य यासारखे मेंदूचे विकार दूर ठेवता येतात किंवा त्यांची तीव्रता कमी करता येते, असे सं केत मेंदूवरील संशोधनात मिळत आहेत.

बौद्धिक कसरतीचा दुसरा फायदा म्हणजे मिळणारा बौद्धिक आनंद. हा आनं दसुद्धा मेंदूत जी जैव रसायने बा ैद्धिक कृतीमुळे तयार होत असतात त्यामुळे मिळतो. या जैव रसायनातील एकाचे नाव संस्कृतमधील "आनंद' या शब्दावरून आनंदमाइड असे ठेवले आहे. "आनंदमाइड' ही जागतिक स्तरावर स्वीकारली गेलेली मेंदूविज्ञानातील वैज्ञानिक संकल्पना आहे. मेंदूपेशी-पेशींतील संवाद साधण्याचे काम आनंदमाइड करते, तेव्हा आनंदमाइडने मेंदूचा प्याला भरला तर केशवसुतांच्या पुढील ओळींना निराळा अर्थ प्राप्त होईल.

काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या ।
प्राशन करिता रंग जगाचे क्षणोक्षणी ते बदलू द्या ।

- डॉ. आनंद जोशी

Friday, June 27, 2008

वाट चुकलेली दिशा

कुणाहीव्यक्तीची कोणतीही वर्तणूक बदलायची असेल, तर त्या व्यक्तीस स्वतःला तसं वाटल्याशिवाय आणि तिनं तो निर्णय स्वतः घेतल्याशिवाय ती वर्तणूक कुणीही बदलू शकत नाही. बाहेरील दबाव, धमक्‍या काहीही उपयोगी पडत नाहीत. वेश्‍या व्यवसायात असणाऱ्या स्त्रियांबाबत हेच निरंतर सत्य लागू आहे. जोपर्यंत प्रत्येक स्त्री स्वतःहून निर्णय घेत नाही, तोपर्यंत वेश्‍या व्यवसाय संपणार नाही.

डॉ. अरुण गद्रे

1) स्थळ ः यवतमाळ वारांगना वस्ती
तारीख ः 13 जून 2008

2) स्थळ ः सीतामढी (बिहार वारांगना वस्ती
तारीख ः 15 एप्रिल 2008

वस्तीत एका पुरुषाचा खून होतो. त्याच रात्री वारांगना वस्तीभोवती असणारा "सामान्य' माणसांचा समाज या वस्तीतल्या धंदेवाल्या स्त्रियांच्या घरांवर हल्लाबोल करतात. अमानुष मारहाण करतात. एखाद्या लहान मुलाला आगीत फेकले जाते. या स्त्रिया पळून जातात. वस्ती रिकामी होते. त्यांच्या सामानाची लुटमार होते. त्यानंतर हे सामान्य नागरिक (स्त्रियांसह) राजकीय नेते कलेक्‍टरला विनंतीवजा निवेदन देतात, की ही वस्ती इथं नको. थोडक्‍यात, आम्ही जे काम केलंय ते शासनानं पूर्णत्वाला न्यावं.

वास्तविक पाहता अनेक वर्षे या वस्त्या तिथं असतात. वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया असतात. त्यांचे या सामान्य समाजातूनच तिथे जाणारे गिऱ्हाईक असते. पण आता मात्रा हा आग्रह मूळ धरू लागला आहे, की "वेश्‍यावस्ती' नको आणि वस्त्या अशा उद्‌ध्वस्त केल्या की ती समूळ नाहीसा होईल.भारतीय संसद याच समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्यांनी बनलेली आहे. ITPA नावांचा (Trafticking) मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आहे. मानवी वाहतूक म्हणजे माणसाची (स्त्री, पुरुष) खरेदी-विक्री व वाहतूक. या कायद्यात संसदेत काही सुधारणा (Amendments) सुचवण्यात आल्या आहेत. आता त्या विचाराधीन आहेत. त्या संसदेनं मान्य केल्या की त्यांचा या कायद्यात समावेश होईल.

या सुधारणांमध्ये एक सुधारणा अशी सुचवण्यात आली आहे, कीजर वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीच्या गिऱ्हाइकाला हे माहीत असेल की ती स्त्री खरेदी-विक्री व वाहतूक करून या व्यवसायात आणली गेली आहे, तर त्या गिऱ्हाइकाला "गुन्हेगार' समजावं व त्याला पोलिसांनी अटक करावी.

ITPA कायद्याप्रमाणे "वेश्‍या व्यवसाय करणे' हा गुन्हा नाही. तरीही अशी सुधारणा का सुचवण्यात आली आहे?यामागे एक गैरसमज आहे तो असा, की वेश्‍या व्यवसाय करणारी प्रत्येक स्त्री ही खरेदी, विक्री व वाहतूक होऊनच या धंद्यात आलेली आहे.प्रत्यक्षात हे असं नाही. वास्तविकता खूप वेगळी आहे. ही सुधारणा सुचवणारी व्यक्ती त्याबद्दल अनभिज्ञ आहे.

ITPA कायद्यानुसार, "अल्पवयीन मुलाला धंदा करायला लावणे' व "खरेदी-विक्री, वाहतूक करून सज्ञान स्त्रीला धंदा करायला लावणे' हे गुन्हे ठरतात. हे अतिशय योग्यच आहे. ते तसेच असायला हवं. त्याबद्दल कुणाचंही दुमत असताच कामा नये. पण वास्तव असंही आहे, की वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या बऱ्याच स्त्रिया या अल्पवयीन नाहीत, तसेच त्या खरेदी-विक्री व वाहतूक करूनही या व्यवसायात आलेल्या नाहीत. नाइलाजानं का होईना पण स्वच्छेनं त्या या व्यवसायात आलेल्या आहेत. नवरे कमवत नाहीत, नवऱ्यानं टाकलेल्या आहेत, शिक्षण नाही, कोणतेही जगण्यासाठी कौशल्य नाही, काम नाही, स्वतःच्या मुलांना, म्हाताऱ्या आई-वडिलांना, सासू-सासऱ्यांना पोसण्याची जबाबदारी यांच्यावर असल्यामुळे त्यांनी हा व्यवसाय स्वीकारलेला आहे.

अशी जर परिस्थिती आहे, तर एखाद्या ग्राहकाला हे मुळात समजण्याचा मार्गच काय आहे, की तो ज्या स्त्रीकडे जात आहे ती खरेदी-विक्री-वाहतूक करून आणली गेलेली आहे? अर्थातच जरी ही सुधारणा उदात्त हेतूंनी सुचवण्यात आली असली तरी जर खरोखरच हा कायदा झाला तर प्रत्येक ग्राहक हा "संभाव्य' गुन्हेगार ठरणार आहे. पोलिस प्रत्यक्षात प्रत्येक ग्राहकाला अटक करू शकणार आहेत! एकूणच या वेश्‍या व्यवसायासंबंधित विचार करणाऱ्यांची दिशाच वाट चुकते आहे. मुळात "वेश्‍या व्यवसाय' फक्त "वेश्‍यावस्ती'तच होतो, हा समजच भाबडेपणाचा आहे. तो आता जास्त प्रमाणात "घरात' व "लॉजवर' होतो आहे. आंध्रमध्ये या स्त्रियांमध्ये काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेची आकडेवारी बोलकी आहे. घरात व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया ः 13,591, लॉजमधून व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया ः 11,714 व वेश्‍यावस्तीतून व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया ः फक्त 694! समाजाच्या सर्व स्तरांत हा होतो आहे. काही उच्चभ्रू व मध्यमवर्गीय स्त्रियाही "पैसे' मिळवण्याचा "एक' मार्ग म्हणून या व्यवसायाकडे बघताना दिसत आहेत. या सर्व "न' दिसणाऱ्या मोठ्या भागाचा कुणीही विचार करताना दिसत नाही.

वेश्‍या वस्तीतल्या महिला दरिद्री आहेत, निराधार आहेत, असहाय आहेत म्हणून घृणेचे, हिंसेचे, अत्याचारांचे ते सोपे लक्ष्य बनत आहेत. पण हे सर्व न्याय्य आहे का, उचित आहे का, मुख्य म्हणजे समाजहिताचं आहे का, याचा विचार व्हायला हवा. लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे आपल्या समाजात एकूणच गुप्तरोग, एचआयव्ही व कंडोमचा वापर या सर्वच प्रकारांबद्दल घनघोर अज्ञानाचा काळाकुट्ट काळोख आहे. अनेक सामाजिक संस्थांच्या अनेक वर्षांच्या कामानंतर आता कुठे या अंधारात थोडी पहाट दिसू लागली आहे.आता कुठे वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या वस्तीतल्या स्त्रियांना कंडोमचा पुरवठा नियमित व अखंडित होऊ लागला आहे. गिऱ्हाइकाला कंडोम वापराचा आग्रह करू लागल्या आहेत. महिन्याला आरोग्य तपासू लागल्या आहेत. एवढेच नव्हे, तर स्वतःची जबाबदारी उचलू लागल्या आहेत. वस्तीत अल्पवयीन मुलगी आली तर स्वतः पोलिसांना खबर देऊ लागल्या आहेत. बारावी परीक्षेनंतर सेलिब्रेट करायला आलेल्या मुलांचे पैसे नाकारून त्यांना एचआयव्ही, कंडोमचं शिक्षण देऊन घरी परत पाठवू लागल्या आहेत.

नेमकं याच वळणावर, समाज हिंसक होऊन वस्त्या उठवू लागला आहे व असा कायदा येऊ घातला आहे की ज्यामुळे प्रत्येक ग्राहक गुन्हेगार ठरू शकणार आहे. या दोन्ही घटितांबद्दल खूप गंभीर विचार व्हायला हवं. कुणाही व्यक्तीची कोणतीही वर्तणूक बदलायची असेल तर त्या व्यक्तीला स्वतःला तसं वाटल्याशिवाय व तिनं तो निर्णय स्वतः घेतल्याशिवाय ती वर्तणूक कुणीही बदलू शकत नाही. बाहेरील दबाव, धमक्‍या, काहीही उपयोगी पडत नाहीत. वेश्‍या व्यवसायात असणाऱ्या स्त्रियांबाबत हेच चिरंतन सत्य लागू आहे. जोपर्यंत प्रत्येक स्त्री स्वतःहून निर्णय घेत नाही, तोपर्यंत वेश्‍या व्यवसाय संपणार नाही. वस्तीमागून वस्ती जाळत गेलो. ग्राहकाला गुन्हेगार ठरवलं तरच आज "दृश्‍य' असणाऱ्या वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, ग्राहक व वेश्‍या व्यवसाय उद्या "अदृश्‍य' व भूमिगत होईल. एकदा हा व्यवसाय भूमिगत झाला तर या स्त्रियांना कोण कुठं हुडकणार? त्यांना कंडोम कसे पुरवणार? आज दर महिन्याला गुप्तरोगांचा तपास करवून घेणाऱ्या या स्त्रिया उद्या भूमिगत झाल्यावर कशा तपासल्या जाणार?

या कल्पनेनंही अक्षरशः थरकाप होतो. सर्वत्र संशय, भीती, गुप्तता व असुरक्षितता पसरली व या स्त्रिया आणि ग्राहकांपर्यंत पोचणारी आरोग्यसेवा ठप्प झाली तर? आज आटोक्‍यात येते आहे असं वाटणारी एचआयव्हीची लाट पुन्हा उसळेल हे निश्‍चित. एचआयव्ही फक्त या दुर्दैवी स्त्रियांनाच होत नाही. तिथंच तो थांबत नाही. त्यांच्याकडून तो सामान्य समाजातल्या ग्राहकांना होतो. ग्राहकांकडून त्यांच्या पत्नींना होतो व त्यांच्या पत्नीकडून त्यांच्या निरागस बालकांपर्यंतही पोचू शकतो. आज समाजाच्या प्रत्येक घटकानं थोडं थांबून विचार करायला हवा. वेश्‍या व्यवसायाचं वास्तव समजून घ्यायला हवं. वेश्‍या व्यवसायाचं रूप, त्यात असलेल्या स्त्रिया, गुप्तरोग, एचआयव्ही त्यांच्यापर्यंत पोचणाऱ्या आरोग्य शिक्षण व आरोग्य सेवांच्या सुविधा, त्यासंबंधाने समज-गैरसमज, कायदे या सर्वांबाबत आपल्या प्रयत्नांची दिशा वाट तर चुकवत नाही?असा समग्र विचार झाला तरच काही आशा आहे.

Saturday, May 31, 2008

...खुनापर्यंत का यावं?

जगण्याचा वाढता वेग, तीव्र स्पर्धा, सगळं काही स्वत:ला मिळायलाच हवं असा अट्टहास, त्यातून बदलणारे सूर, बदलती कुटुंब व्यवस्था, नवी लाइफस्टाइल या सगळ्यातून कमी होत जाणारा इमोशनल कोशंट... दिल्लीत नुकत्याच झालेल्या आरुषीच्या आणि मुंबईतील नीरज ग्रोव्हरच्या खुनामागे ही कारणं असावीत का? धावता धावता आपल्यातील हिंसेंची ही आदिम प्रेरणा उफाळून वर आली आहे का?

वैशाली रोडे

दिल्ली व मुंबई येथे घडलेल्या दोन घटनांनी सध्या संपूर्ण देश अस्वस्थ झाला आहे. एक आहे दिल्लीजवळील नॉयडा या उपनगरात घडलेली घटना. व्यवसायाने डेंटिस्ट असलेल्या डॉ. राजेश तलवार यांनी आपल्या पंधरा वर्षांच्या आरुषी या मुलीचा आणि तिचे ज्याच्याशी संबंध असल्याचा त्यांना संशय होता, त्या हेमराज या नोकराचा खून केल्याचा पोलिसांचा दावा आहे. राजेश तलवार यांचे आपल्या एका डॉक्‍टर मैत्रिणीशी विवाहबाह्य संबंध होते आणि आरुषीला हे ठाऊक होतं. तिला हे आवडत नव्हतं. आपली अस्वस्थता ती हेमराजकडे व्यक्‍त करत असे आणि त्यातूनच ते दोघे जवळ आले असावेत, त्यातूनच हे घडलं असावं, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. डॉ. राजेश तलवार यांची डेंटिस्ट पत्नी डॉ. नुपूर तलवार यांनी आपले पती निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला आहे.

दुसरी घटना आहे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात घडलेली. मारिया सुसयराज या अभिनेत्रीने आपल्या नेव्हल ऑफिसर असलेल्या मित्राच्या, जिरोम मॅथ्यूच्या साथीने एका टीव्ही चॅनेलच्या क्रिएटिव्ह हेडचा- नीरज ग्रोव्हर याचा खून केला. त्याचे तुकडे केले आणि ते मोठमोठ्या पिशव्यांमध्ये भरून त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मारिया ही दक्षिणेतली, कन्नड चित्रपटांत कामं करणारी अभिनेत्री आपलं नशीब आजमावायला मुंबईत आली. कामं मिळवता मिळवताच तिची नीरजशी ओळख झाली, मैत्री झाली. तिचा कोचीचा मित्र मॅथ्यू याला ही मैत्री आवडत नव्हती. त्यातूनच मारियाचं नवं घर लावायला तिला मदत करण्यास गेलेल्या नीरजचं आणि मॅथ्यूचं भांडण झालं आणि मॅथ्यूनं नीरजला भोसकून ठार केलं. मारिया आणि मॅथ्यूनं नंतर नीरजच्या देहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.

दोन्ही घटना तसं पाहिलं तर वेगवेगळ्या; पण तरीही दोन्हींमध्ये काही साम्य आहेच. दोन्ही घटना खुनाच्या आहेत एवढंच फक्‍त त्यांच्यातलं साम्य नाही; दोन्हीमध्ये प्रेमाचा कोन आहे. पण फक्‍त तोही त्यांच्यातला सारखेपणा नाही. या दोन्ही घटना सध्याच्या शहरी लाइफस्टाइलचा परिणाम आहेत.

नवी लाइफस्टाइल

माणसाला मारणं आपल्याकडे तर नाहीच; पण जगात कुठंही नवं नाही. हिंसा ही माणसाची आदिम प्रेरणा आहे. जसजसा माणूस सुसंस्कृत होत गेला, तसा त्यानं या प्रेरणेवर काबू मिळवला. पण तरीही कधीतरी ती बेकाबू होते, उसळून वर येते. खून, मारामाऱ्या त्यातूनच घडतात. हे दोन्ही खून माणसाच्या या आदिम प्रेरणेतूनच झाले आहेत, हे स्पष्ट आहे. पण सुस्थितीचं आयुष्य उपभोगणाऱ्यांमध्ये ही प्रेरणा बेकाबू व्हावी, असं काय घडलं असावं...?

नेमकं याचंच उत्तर आजच्या शहरी लाइफस्टाइलमध्ये सापडतं."आज आपल्या आयुष्याला प्रचंड गती आली आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला सहज आणि तत्काळ मिळते आहे. फास्ट फूडपासून चॅनेल्सच्या चॉइसपर्यंत आणि क्रेडिट कार्डवर होणाऱ्या खरेदीपासून ट्रेन, विमानांच्या बुकिंगपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या हातात आल्या आहेत. त्यामुळे सुखासाठी वाट पाहण्याची सवयच गेली आहे. माणूस "इम्पेशंट' झालाय. त्याचा "इमोशनल कोशंट,' म्हणजे भावनांक कमी झालाय,' मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजन भोसले म्हणतात. "अर्थात म्हणजे आता सगळं संपलंच असं नाही... ही एक फेझ आहे. ती कधी ना कधी पार पडणारच आहे. भावनांक कमी झालाय आणि म्हणूनच कुटुंबातले एकमेकांशी असलेले संबंधही बदललेत. घरातले सगळेच बाहेर पडत आहेत आणि त्यामुळे मुलांवर नीट संस्कार होत नाहीत. या सगळ्याचे परिणाम आता दिसायला लागले आहेत.

'नेमकं याच्याशी संवादी मत कुटुंब समुपदेशक प्रतिमा हवालदार व्यक्‍त करतात. खरं तर त्या स्वत: त्याला मतही म्हणत नाहीत. "इतकं वेगानं घडतंय सगळं, की त्यावर विचार करायला आणि काही मत बनवायला वेळच मिळत नाहीये. एक असं जाणवतंय, की माणसं एकत्रच राहत नाहीयेत. एकत्र राहिली की त्यांची भांडणं होतात; पण त्यांच्यात बंधही निर्माण होतात. आता प्रत्येक जण आपापल्या व्यापात. स्त्रियांच्या कक्षा रुंदावल्या, त्या घराबाहेर पडल्या. पण हे इतकं हलकंफुलकं मानता येईल का? एखादी गोष्ट सहन करणं, बदलणं हे करण्यासाठी एक स्वस्थता लागते. ती आज आहे का? आजूबाजूच्या वातावरणात त्यासाठी एक शाश्‍वतीही लागते. ती तरी आज कुठे दिसते का? कशाचीच शाश्‍वती राहिली नाही की माणसं बांधूनही राहत नाहीत आणि याचे पडसाद मग सामाजिक आणि वैयक्‍तिक विश्‍वात उमटत राहतात.

कोण पुढे पळे तो...

सध्याच्या स्पर्धेच्या युगाकडे प्रतिमा हवालदार लक्ष वेधतात. "वैयक्‍तिक जगात आज स्पर्धेला महत्त्व आलं आहे. माझं पुढे जाणं महत्त्वाचं आहे. आणि तो मागे राहिला तरच मी पुढे जाईन... मग त्याला काही करून मागे खेचा... प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक बाबतीत ही ईर्षा दिसते आहे. प्रत्येकाला काही ना काही साध्य करायचं आहे. प्रत्येक जण कसल्या ना कसल्या शोधात आहे. पण हवं ते मिळत मात्र नाही... म्हणून मग प्रश्‍न पडतो, आता ज्या घटना घडतायत, त्यामागे काय आहे? माणसाच्या वृत्तीतला बदल आहे, की हवं ते मिळत नसल्याची चरफड आहे...?'या दोन घटनांना धरून असे अनेक प्रश्‍न निर्माण होतात. सगळ्यांच्याच मनात. त्यांची उत्तरंही आपण आपल्या परीनं शोधत असतो. माणसाची वृत्तीच बदलली आहे का? सध्याच्या चंगळवादी संस्कृतीत कौटुंबिक मूल्यं नष्टच झाली आहेत का? माणूस अधिकाधिक एकटा होतो आहे का? माणसाचा संयम, त्याचा सारासार विवेक कमी झाला आहे का?

या प्रश्‍नांची उत्तरं हो-नाही अशी नेमकी मिळत नाहीत. एकीकडे माणसामाणसांतला संवाद कमी झाला आहे आणि त्यामुळे माणूस एकटा होतो आहे असं आपण म्हणतो; पण दुसरीकडे ज्यांना तो आपलं म्हणतो, त्यांच्याबद्दल फक्‍त आपलेपणाची भावनाच नाही, तर तो मालकी हक्‍कही गाजवू पाहतो. एकीकडे त्याला कुटुंब हवं असतं; पण दुसरीकडे स्वत:ची स्वतंत्र "स्पेस'ही हवी असते. माझं वैयक्‍तिक आयुष्य हे पूर्णपणे वैयक्‍तिक राहिलं पाहिजे, असा त्याचा आग्रह असतो. आधुनिक काळाची असंख्य प्रेशर्स हा माणूस स्वत:च्या डोक्‍यावर घेत असतो. त्यामुळे त्याचा संयम कमी झालेला आहे, तो चिडचिडा होतो आहे हे निर्विवाद; पण त्यामुळे या प्रेशर्समधून तरून जाण्याचा त्याचा आत्मविश्‍वास मात्र हरवत नाही... काही जणांच्या बाबतीत हाच आत्मविश्‍वास अति तर होत नसावा?

आधुनिक जगाचे आधुनिक ताण

संपूर्ण जग आधुनिक झालंय. या आधुनिक जगाची प्रेशर्स प्रत्येकावर आहेत. प्रत्येक देशाची संस्कृती बदलू पाहते आहे. या बदलत्या संस्कृतीचा आणि परिस्थितीचा परिणाम प्रत्येकाच्या आयुष्यावर होतो आहे. एकूण, प्रत्येक जण सारख्याच परिस्थितीला तोंड देतोय; पण तरीही प्रत्येक माणूस अशी आततायी कृत्यं करत नाही. ती काही जणच करतात.डॉ. राजन भोसले म्हणतात, ""समान परिस्थितीचा परिणाम प्रत्येकावर सारखा होत नाही, वेगवेगळा होतो. ते व्यक्‍तीव्यक्‍तीवरच अवलंबून असतं. आधुनिक पिढी या परिस्थितीतच जन्माला आलेली आहे. त्यामुळे तिचं त्यांना फार काही वाटत नाही, एवढंच.''आजच्या तरुणांमध्ये काम करणाऱ्या "पुकार' संस्थेच्या युवा पाठ्यवृत्ती प्रकल्पाच्या संचालक वंदना खरे म्हणतात, "आजच्या पिढीपुढे अनेक आव्हानं आहेत. त्यातून निर्माण होणारी अनेक कामं त्यांना पार पाडायची आहेत. हे सगळं करताना आपली नाती जपायची आहेत. कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक अशा सर्व पातळ्यांवरच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. आणि त्याचबरोबर याच सर्व पातळ्यांवर निर्माण होणारी प्रेशर्सही झेलायची आहेत. अशा परिस्थितीत ही पिढी आपले आपण मार्ग शोधते आहे.'

आजची तरुण पिढी अत्यंत आत्मविश्‍वासानं आपले मार्ग आपण शोधते आहे हे तर खरंच आहे; पण ते सारासार विचार करून शोधते आहे असं म्हणता येतं का? "नाही, कधी हे मार्ग चुकीचे असतील...' वंदना खरे म्हणतात. "पण आदल्या, म्हणजे आज 40 आणि 50 या दरम्यान असणाऱ्या पिढीनं त्यांना काही बेसच दिलेला नाही. कोणतीही रोल मॉडेल्स त्यांच्यापुढे उभी केलेली नाहीत. "एकाच शिरावर वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक जबाबदाऱ्या घेऊ नका, असंही आपण त्यांना सांगू शकत नाही. समृद्ध जगणं म्हणजे काय, ते फक्‍त सांगू शकतो; प्रत्यक्ष दाखवू शकत नाही. मला वाटतं सगळ्याचा दोष तरुण पिढीच्या माथी मारण्यापेक्षा तिच्या आदल्या पिढीने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाही. या पिढीला मार्ग दाखवले, तर ती पिढी अधिक चांगली घडू शकते.' प्रत्येकच पिढी आपण पुढली पिढी घडवण्यात असमर्थ ठरलो, असं आयुष्याच्या उतारावर सांगत असते. प्रत्येक पिढीत, प्रत्येक युगात नव्यानं पुन्हा माणसाचा, त्याच्या बदलत्या वृत्ती-प्रवृत्तींचा शोध घ्यावा, असं काहीतरी घडतच असतं. खूनही आपल्याकडे नवे नाहीत. रामन-राघवनपासून अगदी अलीकडच्या वृद्ध जोडप्यांच्या हत्यांपर्यंत. मालाड आणि डोंबिवलीला झालेल्या दोन तरुण मुलींच्या हत्येमागे तर पालकांचाच हात असावा, असा पोलिसांचा संशय होता. हत्या पूर्वीपासून होतायत; मग आताच त्यांचा गाजावाजा का होतो?

मीडिया...

याचं एकमेव कारण म्हणजे "मीडिया एक्‍सपोजर'. प्रिंट असोत की इलेक्‍ट्रॉनिक, माध्यमं आता इतकी स्ट्रॉंग झाली आहेत, की त्यांच्यापासून काही लपून तर राहत नाहीच; पण ती प्रत्येक विषयाला प्रचंड प्रसिद्धी देतात. "आजकाल या मीडियामुळेच एखादी घटना घडली की ती चटकन लोकांना कळते आणि त्यावर भरपूर चर्चा होते. मग आपल्याला वाटतं अशा घटनांचं प्रमाण वाढलंय.... खरं तर घटना घडण्याचं प्रमाण तेच आहे, त्या आपल्यापुढे येण्याचं प्रमाण वाढलंय,' डॉ. राजन भोसले म्हणतात.प्रतिमा हवालदार तर या सगळ्याबद्दल अनेक प्रश्‍न उपस्थित करतात. "हे जे घडतंय, त्याला एवढी प्रसिद्धी दिली जाते आहे... पण ते खरंच नवं काही आहे का? ते सगळं इतकं पटापट सांगितलं जाऊ शकतं का? फक्‍त घटना सांगून माध्यमं थांबत नाहीत, तिच्याबद्दलच्या गोष्टीही लिहून मोकळी होतात. आणि मग या सगळ्याचे पडसाद समाजात उमटतात... हे पडसाद विचार केल्यानंतर उमटलेले असतात की ते उमटवलेले असतात?' वर्तमानपत्रातल्या "क्राइम रिपोर्टर'ला असलेलं पूर्वीचं आणि आताचं महत्त्व पाहिलं, तरी या प्रश्‍नांची उत्तरं मिळतात.अर्थात या मीडिया एक्‍सपोजरला पांढरी आणि काळी अशा दोन्ही बाजू असतात. एकीकडे सध्याच्या वेगवान युगात भोवंडून जात असताना आपल्या आजूबाजूला खूप नवं नसेल, पण तरीही नेमकं काय घडतंय, याचं भान आपल्याला ही माध्यमं देत असतात.नव्या जगाला, नव्या युगाला असलेली गती, त्यामुळे निर्माण झालेली प्रेशर्स या गोष्टी एकीकडे नव्या नाहीत; पण तरीही या वेगाला आणि या परिस्थितीला तोंड देण्याचे अधिक योग्य मार्ग शोधण्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल. नव्या पिढीच्या धडपडीतूनच हे मार्ग मिळणार आहेत. अधिक माणुसकीचे... माणसाला माणसाच्या जवळ आणणारे... त्याचा तोल सावरणारे... मग एका हातात राक्षसाचं शीर आणि इतर सर्व हातांत शस्त्र घेतलेली दुर्गा आपण पुजत असलो; आपल्या इतिहासात छोट्या पुतण्याला मारण्यासाठी "ध' चा "मा' करणारी आनंदीबाई असली, तरीही ती अपवादात्मक उदाहरणंच राहतील. एक जागरूक समाज म्हणून आपण फक्‍त आपल्या आजूबाजूला जे घडतंय, त्याकडे बारकाईनं लक्ष ठेवायला हवं आणि तितक्‍याच बारकाईनं त्याचा विचार करायला हवा!

पिढी, नवी जीवनशैली

आजची पिढी खूप वेगवान जगात वावरते आहे. तिला खूप धावायचं आहे. खूप ताणतणाव सहन करायचे आहेत. कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक अशा निरनिराळ्या पातळींवर झगडायचं आहे. तिथले वेगवेगळे ताणतणाव अंगावर घ्यायचे आहेत. आणि हे करता करता मार्गही शोधायचे आहेत. जे काही करायचं आहे, ते स्वत:चं स्वत:च. त्यातच कोणतंही "रोल मॉडेल' समोर नाही. त्यामुळे घडणाऱ्या गोष्टींचं खापर नव्या पिढीच्या माथी मारण्यातही अर्थ नाही...